Sunday, 24 July 2011

"माझा मुलगा कोणाच्या अध्यात नाही कि मध्यात नाही, मी त्याला षंढ बनवतोय"


आपला मुलगा कसा असावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याला घडवतांना प्रत्येक जन आपल्या परीने त्याचे अतिषय लाड करतो, शक्य असेल तेवढ्या चांगल्या गोष्टी त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या या प्रयत्नातच आपण त्याला चुकीच्या मार्गाने नेत चाललो आहोत याची जाणीव देखील आपल्याला नसते.
     आपल्या मुलाने चांगल्या प्रकारे जीवन जगावे म्हणून आपण त्याला लहानपणा पासूनच जपत असतो. कोणताही आजार होऊ नये म्हणून अनेक इंजेक्शन्स दिली जातात, पिण्यासाठी उकळलेले पाणी दिले जाते, आणि अनेक प्रकारे त्याची काळजी घेतली जाते. तो घरात असतांना आपण बऱ्याच गोष्टीं पासून त्याला सावध करत असतो. कोणी काही दिले तर ते घ्यायचे नाही, आपली गोष्ट कोणाला द्यायची नाही, शाळेत स्वताचाच डब्बा खायचा, घरातून आणलेलेच पाणी प्यायचे, कोणतीही गोष्ट वाटून घ्यायची नाही हि आपली शिकवणुक असते. नेमकी याच्या उलट परिस्थिती शाळेत असते. शाळेमध्ये शिक्षक त्याला सर्वांशी सहकार्याने वागायला शिकवतात, आपला डब्बा आपल्या मित्रांशी वाटून खावा, नेहमी इतरांना मदत करावी या प्रकारे तो शिकत असतो. आता अश्या विरोधाभासात त्याने नेमके कोणाचे ऐकावे? त्याने नक्की कोणत्या संस्कारात वाढावे? अशा पेच प्रसंगात तो मोठा होत असतो. 
     काही पालक तर आपल्या मुलांचे कौतुक अशा प्रकारे करतात कि ती बाब कौतुक करण्याची आहे कि शरम वाटण्याची याचेही भान त्यांना नसते. आपला मुलगा किती सोजवळ आहे, तो कसा कोणाच्याही अध्यात आणि मध्यात नसतो हे मोठ्या अभिमानाने इतरांना सांगतात. आता अश्या कोणाच्याही अध्यात आणि मध्यात नसणाऱ्याला, कोणाशीही काही देणे घेणे नसणाऱ्याला काय चाटायचाय? अशी नेभळट मुले कोणाच्या काय कामाची? फक्त स्वताच्या घरापुरता विचार करणारी, स्वताच्या बायको-मुलां पलीकडे कोणाशीही काहीही संबंध न ठेवणारी मुले समाजाच्या काय कामाची? मोठ्या पगारात आपले जग छोटे बनवणारी पिढी काय कामाची?
     असाच विचार जर राजमाता जीजाऊनी केला असता तर? माझा शिवबा कोणाच्याही गडाकडे बघणार नाही कि कोणाच्याही किल्ल्यांकडे त्याची नजर जाणार नाही असे त्यांनी म्हटले असते तर? दुसऱ्यांच्या आया-बहिणींचे काही होत असेल तर होऊ दे, देव-धर्म आणि जनतेचे काही होत असेल तर होऊ दे..माझा शिवबा कोणाच्या अध्यातही नाही आणि कोणाच्या मध्यातही नाही असा विचार जर त्यांनी केला असता तर? लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भगत सिंह, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अशा अनेक स्वताच्या जीवाची परवा न करणाऱ्या महान आत्म्यांनी असा विचार केला असता तर?...तर अजुनही अनेक वर्ष आपल्या पिढ्यांना गुलामगिरीतच षंढा सारखे जगावे लागले असते. असा कोणत्याच अध्यात आणि मध्यात नसणाऱ्याला षंढ नाही तर दुसरे काय म्हणणार?
     माझ्याही माझ्या मुलांकडून अपेक्षा आहेत. त्यांनी त्यांचे घर संसार व्यवस्थित संभाळावे पण सामाजिक बांधिलकीही तशीच ठेवावी. माझी मुले अडल्या-नडल्यांना मदत करणारी तर एखाद्याची अडवणूक करणाऱ्याला आडवी करणारी असली पाहिजेत, भल्यांना त्यांचा आधार तर बुऱ्यांना त्यांची भीती वाटली पाहिजे, सत्त्या साठी आणि समाजहिता साठी दोन घेणारी तर दोन देणारी असली पाहिजेत, त्यांच्याकडे बघणाऱ्या निराधारांना त्यांचा आधार वाटला पाहिजे.

No comments:

Post a Comment